मुंबई : राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरू असून ६५२ केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. आतापयर्ंत एकूण ५ लाखांहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस देण्यात आली आहे. तिसर्या टप्प्यात ५0 वर्षावरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी साधारणपणे १ मार्चपासून होऊ शकते, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे लसीकरण सुरू आहे. प्रत्येक आठवड्याला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज साधारणपणे ४0 ते ४५ हजार आरोग्य कर्मचार्यांना लसीकरण केले जात आहे.
आतापयर्ंत कोविन पोर्टलवर १0 लाख ५४ हजार आरोग्य कर्मचार्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी ४ लाख ६८ हजार २९३ आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरण झाले आहे. ५ लाख ४७ हजार फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी झाली असून त्यापैकी ४१ हजार ४५३ जणांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाच्या तिसर्या टप्प्यात ५0 वर्षावरील व ज्यांना सहव्याधी आहे अशा ५0 वर्षाखालील व्यक्तींना लसीकरण करणार असून त्यासंदर्भात केंद्र शासनकडून सूचना मिळाल्या नाहीत. साधारणपणे दि.१ मार्चच्या सुमारास त्यांची नोंदणी सुरु होण्याची शक्यता असून त्यानंतर लसीकरण केले जाईल असेही टोपे यांनी सांगितले.
राज्यात लसीकरणा दरम्यान कुठेही गंभीर दुष्परिणामाच्या घटनांची नोंद झाली नाही. लसीकरण सुरू असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असून मास्कचा वापर, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
Images Credit : Sakal