मुंबई : कुसुमाग्रज जयंतीनिमित्ताने मराठा राजभाषा दिवस साजरा केला जात असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन करत जनतेला मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मी मराठी, माझी मराठी! बाणा जपू या!, असे आवाहन करत मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही?, पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापयर्ंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा शिरवाडकर यांना मुख्यमंत्र्यांनी जयंतीनिमित्त अभिवादन केले. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणाले, मराठीला माय मराठी म्हणण्याचा, अमृताते ही पैजा जिंकणारी भाषा म्हणून तिचा अभिमान मिरविण्यासाठी मी मराठी, माझी मराठी! असा बाणा जपू या! त्यासाठी मराठीत विचार करू या, मराठीत बोलू या, व्यक्त होऊ या. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवू या. मराठीतील लेखन-वाचनाच्या नवनव्या प्रयोगांचा स्वीकार करू या. मुलांमध्ये, तरुणांमध्ये मराठीची ओढ वाढावी, तिची गोडी लागावी यासाठी कलाविष्कार, मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून होणार्या प्रयत्नांचे स्वागत करू या. नव तंत्रज्ञान, नव माध्यमात, समाज माध्यमातही मराठीचा आवर्जून वापर करू या!, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मराठी ही आपल्या रोमारोमात भिनलेलली भाषा आहे. माझी माती, माझी माता, माझे मातृभूमी. माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा गौरवाचा विषय असून, हा गौरव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापयर्ंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या एका ध्येयाने एक होऊन पुढे जाऊ या. मग पाहू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही?, या आपल्या भूमिकेचा देखील मुख्यमंत्र्यांनी पुनरूच्चार केला आहे.