• Mon. Sep 25th, 2023

पोहरादेवीतील गर्दीवर प्रशासनाने कारवाई करावी

ByGaurav Prakashan

Feb 24, 2021

मुंबई : वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

आज राज्यातही कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे एका बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्त्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे. मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले. कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे.

जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीमार
ना. राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरादेवीमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. ना. संजय राठोड हे साधारण ११ वाजताच्या सुमारास यवतमाळमधून पोहरादेवीकडे सहकुटुंब रवाना झाले होते. यवतमाळ ते पोहरादेवी हे अंतर कापून ते तासाभरात पोहरादेवीत पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेना नेते, पदाधिकारी यांच्यासह तब्बल १७ वाहनांच्या ताफ्यासह ते पोहरादेवीत आले होते. यावेळी मंदिर परिसरात हजारो लोक जमल्यामुळे राठोड यांच्या गाडीला वाट मिळण्यासाठी मोठी अडचण होव्ऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडल्यामुळे पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागला.

संजय राठोड यांचे मंत्रिपद धोक्यात..!
मुंबई : संजय राठोड यांना पोहरादेवी इथले शक्तिप्रदर्शन भोवण्याची शक्यता आहे. वनमंत्री संजय राठोड यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. संजय राठोड प्रकरणी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. राठोड यांनी गर्दी जमवून केलेल्या शक्ती प्रदर्शनाबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर आता त्यांचे पद धोक्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राठोड यांच्या प्रकरणामुळे आणि त्यांनी याप्रकरणी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र तयार झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पोहरादेवी इथल्या गर्दीप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे शरद पवारांनीही नाराजी व्यक्त केल्याने राठोड यांचे मंत्रीपद धोक्यात आले आहे.!
पोहरादेवीमध्ये झालेल्या गर्दीबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. कोविडसंदर्भात आरोग्याचे नियम सर्वांना सारखेच असं मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. कोरोना काळात वनमंत्री संजय राठोड यांनी जमवलेल्या गर्दीची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या गर्दीप्रकरणी वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना अहवाल देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.