• Sun. May 28th, 2023

पाणीपुरवठा योजनेतून प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी-पालकमंत्री

ByGaurav Prakashan

Feb 1, 2021

अमरावती : केंद्र शासन पुरस्कृत जल जीवन मिशन राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या मिशनच्या अंमलबजावणीतून राज्यातील सर्व ग्रामीण कुटुंबांना सन २0२४ पयर्ंत वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई प्रतिदिन किमान ५५ लिटर गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. या मिशन अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील १ हजार ५८८ गावांसाठी एकूण ४ लाख ५६ हजार ६२१ कार्यात्मक नळजोडणी करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरळीत नियोजन करुन पाणीपुरवठा योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण करा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावाला नियमितपणे पिण्याचे पाणी उपलब्ध होऊन पाणी टंचाईचा प्रश्न सोडविता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन मिशन अंतर्गत गावांत होणार्‍या पाणीपुरवठा योजनांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेंद्र भुयार, आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता कोपूलवार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. सावळकर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून केंद्र शासनाने जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा करण्याचे राज्यांना कळविले आहे. राज्य शासनानेही हे मिशन राबविण्यासाठी मान्यता दिली आहे. या मिशनच्या अंमलबजावणीतून राज्यातील सर्व ग्रामीण कुटुंबांना सन २0२४ पयर्ंत वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई प्रति दिन किमान ५५ लिटर गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे.
या मिशन अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील १ हजार ५८८ गावांसाठी एकूण ४ लाख ५६ हजार ६२१ कार्यात्मक नळजोडणी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी एकूण ३ लाख १0 हजार ६५६ कार्यात्मक नळजोडणी झालेल्या आहेत. उर्वरित १ लाख ४५ हजार ९६८ कार्यात्मक नळजोडणी करणे अपेक्षीत असून त्यासाठी सुनियोजित उपाययोजना आखून पाणी पुरवठा योजना निहाय सदर गावांना नियमितपणे पाणीपुरवठा होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. जल जीवन मिशन हा कालबद्ध कार्यक्रम असल्याने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांन्वये व त्याअनुषंगाने निर्गमित शासन निर्णयानुसार राज्यात जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाव्दारे गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ठ विहित मुदतीत साध्य करण्यासाठी पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्यात यावा. मेळघाटसह इतर तालुक्यातील गावांना सुरळीत पाणीपुरवठा होईल यासाठी अचूक नियोजन करुन कामे पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *