अमरावती:प्रतिकारशक्तीने संसर्गावर मात करता येते. अंडी व चिकन हा प्रथिनांनी संपृक्त आहार असून, ते पूर्णपणे उकडून खाणे सुरक्षित आहे, असे सांगत बर्ड फ्लूबाबत कुणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन पोल्ट्रीधारकांनी आज केले. बर्ड फ्लू जनजागृतीसाठी कार्यक्रम येथील बर्थ डे सभागृहात आज सायंकाळी झाला. यावेळी अंडी व चिकनचे विविध पदार्थ अनेक मान्यवरांनी खाऊन ते अन्न पूर्णतः सुरक्षित असल्याचा दाखला दिला.पशुसंवर्धन विभाग व पोल्ट्रीधारकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
जि. प. चे अतिरिक्त सीईओ तुकाराम टेकाळे, कॅफो चंद्रशेखर खंडारे, प्रशांत थोरात, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे अमृता हचरिजचे संचालक डॉ. शरद भारसाकळे यांच्यासह विविध पोल्ट्रीधारक यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूसदृश स्थिती आढळलेली नाही. चिकन- अंडी योग्य पद्धतीने शिजवल्यास पूर्ण सुरक्षित आहे. शिवाय, ते खाल्ल्याने इम्युनिटी वाढते. संसर्गाशी लढण्याशी ताकद अंडी व चिकनमधून मिळते. त्यामुळे उत्कृष्ट अन्न असलेल्या या अन्नाबाबत गैरसमज पसरू नयेत, असे आवाहन श्री. टेकाळे व श्री. गोहोत्रे यांनी केले.
बर्ड फ्लूबाबत गैरसमज पसरून पोल्ट्रीधारकांचे नुकसान होते. व्यवसाय व रोजगाराची हानी होते. कोरोनाकाळात तर नियमित चिकन अंडी खाऊन प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. दणकट आरोग्यासाठी ते आवश्यक असल्याचे श्री. भारसाकळे व विविध पोल्ट्रीधारकांनी सांगितले.
बर्ड फ्लूबाबत अफवा पसरवू नका
Contents hide