अमरावती : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. याबाबत पात्र व्यक्तींकडून अर्ज मिळवून यापूर्वीची प्राप्त प्रकरणेही तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकताच आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. जायका ब्रोकरेज व संबंधित कंपनी प्रतिनिधी व कृषी अधिका-यांना तात्काळ प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश त्यांनी दिले. शेतकरी कुटुंबातील व्यक्तीची शेतीव्यवसाय करताना होणारे रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, खून, उंचावरून पडून मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून हत्या, जनावरांच्या हल्ल्याने जखमी होणे, मृत्यू आदी घटनांमुळे ब-याच शेतक-यांचा मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व येते. कर्ता व्यक्तीच्या अपघातामुळे कुटुंबांपुढे आर्थिक अडचण निर्माण होते. त्यामुळे या योजनेतून अपघातग्रस्त कुटुंबातील वारसदारांना लाभ देण्यात येतो. अपघातग्रस्त कुटुंबातील वारसदारांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून विहित अर्ज मिळवून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे यांनी केले आहे.
योजनेत सर्व वहिती खातेदार शेतकरी, त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणतेही एक सदस्य (आई-वडील, शेतक-यांची पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वयोगटातील एकूण दोनजणांना योजनेतून लाभ मिळू शकतो. तशी तरतूद गतवर्षी करण्यात आली, असेही श्री. चव्हाळे यांनी सांगितले.
Related Stories
March 27, 2024
March 26, 2024
March 24, 2024