अमरावती : संविधान हा लोकशाहीचा आत्मा आहे. धर्मनिरपेक्षता व संविधानाने दिलेल्या विविध मूल्यांच्या संरक्षणासाठी एकजुटीचे आवाहन करत, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री . यशोमती ठाकूर यांनी शेतकरी बांधव, महिला, वंचित, गरीब व गरजूंच्या हितासाठी विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याचा निर्धार आज व्यक्त केला. भारतीय प्रजासत्ताकाच्या ७१ व्या वर्धापनदिनोत्सवात जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन झाले. त्यानंतर त्यांनी गत वषार्तील घटना, विकास प्रक्रियेचा आढावा घेत जिल्ह्यातील नागरिकांना संबोधित केले. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, पोलीस महानिरीक्षक संजयकुमार मीना, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोरोना महामारीने वर्षभरात उद्भवलेल्या अडचणी, त्यावर मात करण्यासाठी झालेले प्रयत्न व शेतकरी, महिला, गरीब, गरजू, वंचितांसाठी शासनाने घेतलेले निर्णय, अंमलबजावणी यांचा आढावा घेत पालकमंत्र्यांनी आपल्या चिंतनशील भाषणातून भारतीय संविधान व लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी एकजुटीचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, गेल्या वर्षभराचा कालखंड खूप काही शिकवणारा होता. अनेक अडचणी उभ्या राहिल्या. अनेक बाबी नव्याने उभाराव्या लागल्या. आता लस उपलब्ध झाल्यामुळे ही लढाई निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. या काळात अत्यंत कमी वेळेत जिल्हा कोविड रुग्णालय, तालुका कोविड रूग्णालय व हेल्थ सेंटर, तसेच विद्यापीठ व पीडीएमसी येथे लॅब उभी राहिली. अमरावती हे मध्यभारतातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा असणारे महत्वाचे केंद्र होण्यासाठी प्रयत्न होत आहेत.हजारो गरजूंनी त्याचा लाभ घेतला. कोरोनाच्या संकटाशी लढत असताना या काळात विकासाचे चक्र थांबू दिले नाही. उद्योगवाढीसाठीही प्रयत्न झाले. त्यानुसार मॅग्नेटिक महाराष्ट्रअंतर्गत अमरावतीत दोन नवे उद्योग उभारले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांसाठी शेतीकेंद्रित विकासावर महाविकास आघाडी शासनाने भर दिला आहे. त्यासाठी सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पाऊल उचलले. गेल्या १0 वर्षात झाली नाही अशी विक्रमी कापूस खरेदी झाली. शेतकरी ते थेट ग्राहक योजना, जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव, कृषी संजीवन सप्ताह असे नवनवे उपक्रम राबविले गेले. विकेल ते पिकेल या संकल्पनेतून शेतकरी गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात२४४ विक्री केंद्रे सुरू करण्यात आली. शेतकरी बांधवांना बांधावर खतपुरवठा करण्यात आला. पावसाने नुकसानीच्या अनुषंगाने ३ लाख ६७ हजार 0१६ शेतक-यांना सुमारे ३३७ कोटी रुपये मदतीचे वाटप होत आहे. ह्यपोकरा अंतर्गत सहा हजारांहून अधिक शेतक-यांना सुमारे १२ कोटी रुपए अनुदान देण्यात आले. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातही पाचशेहून अधिक अर्ज प्राप्त असून, अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यात येईल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत ६ हजारहून अधिक शेतक-यांना ठिबक व तुषार सिंचन संचाचा लाभ मिळाला. अमरावती व चांदूर बाजार तालुक्यात बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्रांसाठी १ कोटी २0 लाखांचे अर्थसाह्य देण्यात आले. कोविड काळात अंगणवाड्या बंद ठेवाव्या लागल्यामुळे बालकांना घरपोच आहार पुरवठा करण्यात आला. राज्यात पोषण आहार लाभार्थ्यांची संख्या ७५ लाखांवर नेण्यात आली आहे, असेही त्या म्हणाल्या. गडचिरोली जिल्ह्यात अपर पोलीस अधिक्षकपदी कार्यरत असताना दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून अतुलनीय कामगिरी बजावणा-या जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधिक्षक डॉ. हरी बालाजी यांना पोलीस शौर्य पदक मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनीष ठाकरे, सहा. पो. उपनिरीक्षक अशोक मांगलेकर व पुरुषोत्तम बारड यांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला. बसला आग लागून घडलेल्या दुर्घटनेत ५७ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याबद्दल तिवसा पोलीस ठाण्याचे शिपाई नीलेश खंडारे यांनाही यावेळी गौरविण्यात आले. शहिद जवान मुन्ना शेलुकर यांच्या वीरपत्नी पूजा मुन्ना शेलुकर यांचा यावेळी ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Related Stories
October 2, 2023
October 2, 2023