मुंबई : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका २-१ ने जिंकली. चौथ्या सामन्यात गाबाच्या मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाचा ३२ वर्षांचा अबाधित गड सर केला. शुबमन गिल, ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने ३२८ धावांचे आव्हान पार केले. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेवर गेला. त्यानंतर पुढील तीन सामन्यात मराठमोळ्या अजिंक्यने भारतीय संघाची धुरा वाहिली.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करणार्या अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ३२ वर्षांपासून अजिंक्य असलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताच्या अजिंक्यने धूळ चारली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिका २-१ अशी जिंकत पराक्रम केला. त्यानंतर अजिंक्य भारतात परतल्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशाचा गजर आणि रेड कार्पेट अशा थाटात त्याचे सर्वांनी स्वागत केले.
मालिका विजयानंतर अजिंक्य मुंबईत परतला आणि त्याचे स्वागत दणक्यात झाले. मुंबईच्या रूपारेल कॉलेजसमोरील इमारतीत अजिंक्यसाठी रेड कार्पेट हांथरून ठेवण्यात आले होते. दोन महिन्यांहून अधिक काळ लेकीपासून दूर असलेल्या अजिंक्यने मुलीला कडेवर घेतच जंगी स्वागताचा स्वीकार केला. सोबत अजिंक्यची पत्नीदेखील होती.
ढोल ताशांच्या गजरात अजिंक्यचं स्वागत करण्यात आले. विराट नसतानाही भारतीय संघ कमकुवत नाही हे अजिंक्यच्या नेतृत्वाने जगाला दाखवून दिले.
Related Stories
October 2, 2023
October 2, 2023