अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, “विद्येबरोबर शील आवश्यक आहे. शीलाशिवाय विद्या फुकाची आहे. कारण शिक्षित मनुष्याच्या चातुर्य व बुद्धिला शीलाची जोड मिळाल्यास ते फसवेगिरी व लबाडी करणार नाहीत, म्हणून प्रत्येक माणसात शील हवे. बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम अप्रतिम होते. ते गर्दित, कार्यक्रमातील फावल्या वेळी, लोकसभा व विधानसभेच्या हॉलमध्ये रिकाम्यावेळी कानात कापसाचे बोळे टाकून वाचन करीत. कारण त्यांच्यात वाचनाचा दांडगा आत्मविश्वास होता. आजच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे हे अप्रतिम वाचनवेड अंगिकारल्यास त्यांचे विद्यार्थी जीवन समृद्ध होईल. बाबासाहेबांचे कर्तृत्त्व इतके अनमोल होते की, त्यांच्या हयातीपासून तर आजपर्यंत त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर लाखो कवी आणि गीतकारांनी लाखो कविता व लोकगीते रेखाटली. गायकांनी ती गायन करुन समाजापर्यंत पोहोचविली, त्यामुळे सामाजिक चळवळी गतिमान होत गेल्या. समाजपरिवर्तनाचे फार मोठे कार्य त्यामुळे होऊ शकले”. असे विचार कवी-लेखक-समाजप्रबोधनकर्ते प्रा. अरुण बा. बुंदेले यांनी अध्यक्षपदावरुन व्यक्त केले.
ते श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संपन्न झालेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन विचार व्यक्त करीत हातेे.
दस्तुर नगर रोडवरील एस. कुमार फोटो स्टुडिओ येथे संस्थेच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजप्रबोधनकर्ते प्रा. अरुण बुंदेले, प्रमुख अतिथी संस्थाध्यक्ष श्री. अनिल भागवतकर तर श्री. संजय खंडारे श्री. कृष्णा मोहोकार, श्री. प्रभाकरराव बुंदिले, श्री. रमेशराव भटकर, श्री. मधुकरराव विरुळकर, चि. कुणाल खंडारे, श्री. पुंडलिकराव लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष व पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व हारार्पण झाले. प्रा. अरुण बुंदेले यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या स्वरचित वंदनगीताचे गायन केले. प्रमुख अतिथी श्री. अनिल भागवतकर यांनी ‘डॉ. आंबेडकरांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज‘ या विषयावर विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन श्री. संजय खंडारे, आभार श्री. रमेशराव भटकर यांनी मानले. कार्यक्रमाला समाजकार्यकर्ते श्री. पुरुषोत्तम वनस्कर, श्री उत्तमराव इसाळकर, श्री. गणेश भागवतकर, श्री. दिनेश भागवतकर, श्री. सुनिल खंडारे,श्री. विशाल इंगळे व समाजबांधव उपस्थित होते.
“डॉ.आंबेडकरांचे अप्रतिम वाचनवेड विद्यार्थ्यांनी अंगीकारणे आवश्यक” – प्रा. अरुण बुंदेले
Contents hide