नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षेविषयी एकसमान विचार करण्यावर आणि देशाच्या सर्वांगीण सुरक्षिततेत प्रत्येक व्यक्तीची भूमिका काय असावी यावर विचार करण्यावर जोर दिला. राष्ट्रीय सुरक्षा ही सैनिकांची जबाबदारी आहे असा सर्वसाधारण समज आहे परंतु खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सुरक्षेचा अर्थ व्यापक आहे असे ते म्हणाले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एडमिनिस्ट्रेशन अर्थात भारतीय लोक प्रशासन संस्थेमध्ये काल ‘राष्ट्रीय सुरक्षा संवाद’ या विषयावर भाषण करताना माजी लष्करप्रमुखांनी सहभागींना परिवर्तनाचे प्रवर्तक होण्यासाठी प्रोत्साहन दिले. संपूर्ण राष्ट्रीय सुरक्षा प्राप्त करण्यासाठी मानसिक आणि सामाजिक भावनिष्ठा बदलणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सुरक्षा ही तुकड्यांमध्ये साध्य करता येत नाही त्यासाठी बाह्य सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, सायबर सुरक्षा इत्यादी सर्व सुरक्षा विषयक बाबींचा एकात्मिक दृष्टीकोन म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आहे, असे ते म्हणाले .
संरक्षण उपकरणे खरेदी, सायबर स्पेस सुरक्षा आणि तंत्रज्ञानामधील आत्मनिर्भरता यावर प्रकाश टाकण्याबरोबरच सुरक्षाविषयक एकंदरीत बाबी लक्षात घेता तंत्रज्ञानाचा वापर, नाविन्यपूर्ण आणि कुशल दृष्टिकोन याबद्दलही मंत्र्यांनी यावेळी आपले विचार मांडले. संरक्षण उपकरणाच्या स्वदेशी उत्पादनात क्षमता विकसित करण्यासाठी आत्मनिर्भर भारत यावर त्यांनी भर दिला.
भारतीय लोक प्रशासन संस्थेचे शिक्षक आणि वरिष्ठ कर्मचारी या सत्राला उपस्थित होते.
जनरल व्ही. के. सिंह यांनी भारतीय लोक प्रशासन संस्थेमधील महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला.
Related Stories
March 27, 2024
March 26, 2024
March 24, 2024